Jump to content

ऑपरेशन पोलो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हैदराबाद पोलिस कारवाई
दिनांक सप्टेंबर १३, १९४८सप्टेंबर १८, १९४८
स्थान हैदराबाद राज्य सीमा
परिणती भारताच्या एकसंघतेचा विजय, हैदराबाद राज्य भारतात विलीन
युद्धमान पक्ष
भारत हैदराबाद राज्य
बळी आणि नुकसान
सैनिक: ३२ मृत
शेकडो जखमी
१,८६३
शेकडो जखमी

भारतीयहैदराबाद मुक्तिसंग्रातील हैदराबाद पोलीस कारवाई तथा ऑपरेशन पोलो ही भारतीय सैन्याने सप्टेंबर १९४८मध्ये हैदराबाद राज्याविरुद्ध केलेल्या हालचाली व त्यानंतरच्या घटना होत्या. या कारवाईद्वारे भारताने हैदराबाद राज्य स्वतःत विलीन करून घेतले.

पार्श्वभूमी 

महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेसची स्वातंत्र्य आंदोलनाची भूमिका केवळ परकीय राजवटीस घालवण्याचीच नव्हती तर भारतातील राजे राजवटींच्या एवजी सर्वसामान्यांची लोकशाही स्थापन व्हावी अशी भूमिका होती या भूमिकेतून स्वतंत्र भारत राज्यातून सरंजामशाहीचा अंत झाला पाहिजे अशा हेतूने स्वतंत्र भारतात संस्थानिकांचे विलीनीकरणाची काँग्रेसची असधिकृत भूमिका होती,या भूमिकेचे अजून एक कारण भारतीय इतिहासात उपमहाद्विपातील असंख्य राजे ते सरंजामशही संस्थानिक यांच्यातील संघर्षाचा परकीय आक्रमकांना फायदा मिळत गेल्याच्या इतिहासाची पुर्नावृत्ती होऊ नये असेही होते.स्वतंत्र भारताच्या रचने नंतर सरदार वल्लभभाई पटेल यांनी सर्व संस्थानांशी बोलणीकरून विलीन करून घेतले.

हैदराबादचे संस्थान हैदराबाद राज्य ब्रिटिश राजवटीच्या अस्ताच्या वेळी पर्यंत टिकुन असलेले केवळ सर्वात मोठे स्वायत्त संस्थानिक राज्यच नव्हते तर उत्तर आणि दक्षीण भारताच्या मधोमध पसरले होते.त्याचे स्वतंत्र राहणे भारताच्या एकसंघतेस कमकुवत ठरवणारे होते.पण त्याही पलिकडे हैदराबाद संस्थानातील जनता स्वतःच्या चळवळी आणि आंदोलनांना भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचाच एजक भाग समजत आली होती

तत्कालीन निजामाने सरदार वल्लभाईंच्या सामिलीनीकरण प्रस्तावांची केवळ अवहेलनाच केली नाहीतर हैदराबाद राज्यातील जनतेने चालविलेल्या लोकशाहीच्या मागणीच्या तसेच भरतीय संघराज्यात सामील होण्याकरिता चालविलेल्या जन आंदोलनास चिरडण्याकरिता तत्कालीन निजामाने रजाकार नावाच्या अमानुष संघेटनेकरवी अनन्वित अत्याचारांचा कळस गाठला गेलेला होता.हे अत्याचार एवढे अनन्वित होते की हैदराबाद मुक्तिसंग्रातील काँग्रेस कार्यकर्यांच्या शस्त्रे हाती घेऊ देण्याच्या विनंतीस स्वतः महात्मा गांधींनी सुद्धा संमती दिली.[१]. या पार्स्वभूमीवर भारत सरकारने ऑपरेशन पोलो' अंतर्गत तत्कालीन हैदराबाद राज्य सामिल करून घेतले.

पोलीस कारवाई[संपादन]

हैदराबाद मुक्तीसंग्रामाची अखेर पोलिस कारवाईने झाली. निजामी शासनसत्तेचा प्रतिकार १०९ तासात संपुष्टात आला. ही पोलीस कारवाई म्हणजे लष्करी कारवाई होती. तिला आॅपरेशन पोलो नाव दिले होते. त्याआधी सीमेवर घुसखोरी करणाऱ्या निजामी लष्कर व रझाकारी टोळ्यांविरुद्ध आॅपरेशन कबड्डी चालवले गेले होते. इ.स. १९४८ च्या आॅगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात आॅपरेशन पोलोची तयारी सुरू झाली. या मोहिमेसाठी फर्स्ट ग्वालियर लान्सर्स, मैसूर लान्सर्स, मेवाड इन्फंट्री, फोर्थ ग्वालियर इन्फंट्री, राजाराम रायफल्स, फर्स्ट मैसूर इन्फंट्री यातील दले तैनात केली होती. या लष्कराला हवाई दलाचे व रणगाड्यांचे सहाय्य होते.

सदर्न कमांडचे सरसेनापती लेफ्टनंट जनरल राजेंद्रसिंह हे पुण्याच्या मुख्यालयातून सर्व सूत्रे हलवीत होते. वेगवेगळ्या विभागांसाठी दलप्रमुख होते. सोलापूरहून शिरलेल्या तुकड्यांचे नेतृत्व मेजर जनरल जयंतीनाथ चौधरी यांच्याकडे होते तर छत्रपती संभाजीनगर च्या बाजूने शिरलेल्या तुकड्यांचे नेतृत्व मेजर जनरल डी.एस. बार यांच्याकडे होते. हैदराबाद संस्थानात पाच दिशांनी लष्कर शिरले. वायव्येला छत्रपती संभाजीनगर कडून, पश्चिमेला सोलापूरकडून, ईशान्येला आदिलाबादकडून, दक्षिणेला कर्नुलकडून तर आग्नेयेला विजयवाड्याकडून लष्कराने संस्थानी हद्दीत प्रवेश केला.

१३ सप्टेंबर, इ.स. १९४८ रोजी पहाटे ४ वाजता कारवाई सुरू झाली. पहिल्या तासातच तुळजापूर सर झाले. नळदुर्गला जोरदार प्रतिकार झाला. तेथील पूल निजामी सैन्याने उडवून देण्यापूर्वीच भारतीय लष्कराने कब्जात घेतला. सेनेने छत्रपती संभाजीनगर च्या बाजूला जालना रस्त्याने मुसंडी मारली. परभणी जिल्ह्यात कन्हेरगाव जिंकले. कर्नुल विभागात तुंगभद्रेवरील महत्त्वाचा पूल ताब्यात आला. आदिलाबाद भागात बल्लारशहाचा पूलही ताब्यात आला. वरंगळ व बीदरच्या विमानतळांवर बाँबफेक केली.

१४ सप्टेंबरला दौलताबाद मुक्त केले. जालनाही मुक्त केले. सोलापूरकडून शिरलेल्या तुकड्या सिकंदराबादच्या अर्ध्या वाटेवर पोहोचल्या. छत्रपती संभाजीनगर व येरमाळाही ताब्यात आले. विजयवाड्याच्या फौजा सिकंदराबादपासून साठ मैलांवर पोहोचल्या. याच दिवशी कर्नुल येथील रझाकारांचा प्रतिकारही मोडून काढण्यात आला व वरंगळ आणि बीदरच्या विमानतळांवर पुन्हा हल्ला करण्यात आला.

१५ सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगर वरील चढाई फत्ते झाली. हुमनाबाद पडले. शहागडच्या पुलावर कब्जा झाला. जनरल चौधरींची तुकडी सिकंदराबादपासून नव्वद मैलांवर पोहोचली.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "मराठवाडा (हैदराबाद) मुक्तीसंग्रामाचा दैदिप्यमान लढा..." 2021-05-11 रोजी मूळ पानापासून संग्रहित. २२ मे २०२१ रोजी पाहिले.