भारतीय क्रिकेट संघ कसोटी खेळणाऱ्या संघापैकी आहे. भारताचा पहिला अधिकृत कसोटी सामना जून २५, १९३२ रोजी सुरू झाला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया) ही भारतीय क्रिकेटची प्रशासकीय संघटना आहे. क्रिकेट भारतातील सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहे.
१७२१ मध्ये भारतात पहिला क्रिकेट सामना खेळला गेल्याची नोंद आहे. ब्रिटिशांसोबत हा खेळ भारतात आला. १८४८ मध्ये मुंबईच्या पारसी लोकांनी स्थापलेला ओरिएंटल क्रिकेट क्लब हा भारतातील भारतीयांनी स्थापलेला पहिला क्लब आहे. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस काही भारतीय इंग्लडमध्ये क्रिकेट खेळण्यास गेले. त्यांपैकी रणजीत सिंग व दुलिप सिंग हे लोकप्रिय खेळाडू होते. ह्या दोघांच्या नावाने भारताच्या दोन महत्त्वाच्या राष्ट्रीय स्पर्धा खेळविण्यात येतात. सन १९२६ मध्ये भारताला इंपिरियल क्रिकेट संघात सामिल करण्यात आले. १९३२ मध्ये भारताने पहिला कसोटी सामना इंग्लंड क्रिकेट विरुद्ध खेळला. ह्या सामन्यात भारताचे कर्णधार महान फलंदाजसी.के. नायडू होते. स्वातंत्र्यानंतर भारताने पहिला सामना ऑस्ट्रेलिया क्रिकेट विरुद्ध १९४८ मध्ये खेळला. भारताने सर्वप्रथम कसोटी सामन्यात विजय १९५२ मध्ये इंग्लंड विरुद्ध मिळवला. १९५२ मध्येच भारताने सर्वप्रथम कसोटी मालिका जिंकली (पाकिस्तान विरुद्ध).भारताचा कर्णधार २०१६ मध्ये विराट कोहली झाला .
सचिन तेंडुलकरच्या नावावर सर्वात जास्त विक्रम आहेत. सर्वात जास्त एकदिवसीय सामने व कसोटी सामने खेळण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. ह्या शिवाय एकदिवसीय सामने व कसोटी सामन्यात सर्वात जास्त शतके ठोकण्याचा विक्रम सुद्धा त्याच्या नावावर आहे. कसोटी सामन्यातील सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम विरेंद्र सेहवागच्या(३०९ धावा) नावावर आहे. विरेंद्र सेहवाग हा एकमेव भारतीय क्रिकेटपटु आहे ज्याने त्रिशतक झळकावले आहे. कसोटी सामन्यात संघाची सर्वात जास्त धाव संख्या ७०५ (वि. ऑस्ट्रेलिया) तर एकदिवसीय सामन्यातील सर्वोच्च धाव संख्या ४१३ ( वि.बर्म्युडा) आहे.
भारताच्या अनिल कुंबळे ने एकाच डावात १० विकेट (वि. पाकिस्तान)घेण्याचा विक्रम केलेला आहे, ह्या शिवाय ५०० कसोटी बळी घेणारा तो पहिलाच भारतीय गोलंदाज आहे.